(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरालगत असलेल्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच धनश्री दीपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ४९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने शिरगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धनश्री यांच्यावर काही दिवसांपासून कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
एक हसतमुख, मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचपदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली होती. त्यांच्या कार्यकाळात गावातील अनेक विकासकामे मार्गी लागली. त्यानंतरही त्या विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असत.
धनश्री यांच्या निधनाने परिवारासह शिरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती दीपक नारायण सनगरे (रा. तिवंडेवाडी, शिरगाव) आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
मंगळवार, ८ जुलै रोजी सकाळी शिरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला गावकरी, नातेवाईक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.