(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना इस्रो (भारत) आणि नासा (अमेरिका) संस्थांना भेट देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला अभ्यासदौरा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली दरवर्षी तेच-तेच अधिकारीच या दौर्यात सहभागी होत असल्याचे प्रकार समोर आले असून, यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अंतराळ संशोधनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी, यासाठी तीन वर्षांपूर्वी या अभ्यासदौऱ्याची सुरुवात करण्यात आली होती. गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना इस्रो व नासा येथे प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी हा प्रयत्न होता. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी खर्च केला जातो. मात्र, शिक्षणाशी संबंधित नसलेले अधिकारी व कर्मचारी या दौर्यात वारंवार सहभागी होत असल्यामुळे मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीही चाळणी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी इस्रो दौर्याचे आयोजन झाले. मात्र, या दौर्यात नेहमीप्रमाणे काही ठरावीकच अधिकारी सहभागी झाल्याचे दिसून आले. गेल्या तीन वर्षांपासून हेच अधिकारी या दौर्यात सामील होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना या दौर्यात संधी मिळायला हवी होती. पण त्याऐवजी शिक्षणाशी फारसा संबंध नसलेले कर्मचारी या दौऱ्यात जात आहेत. यामुळे शिक्षण विभागातील अनेकांनी नाराजी व्यक्त करत, “अधिकाऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या,” अशी मागणी केली आहे. दौऱ्यावर लाखो रुपयांचा खर्च होतो, आणि त्याच खर्चातून आणखी काही विद्यार्थी सहभागी होऊ शकले असते.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. “दरवर्षी तेच अधिकारी का जातात? आणि शिक्षणाशी संबंधित नसलेल्यांचा यात समावेश का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला. मात्र, यावर अधिकार्यांनी टाळाटाळीची उत्तरे देत वेळ निभावली. एकूणच, विद्यार्थ्यांच्या नावाखाली अधिकारी ‘शैक्षणिक सहली’ करत असल्याच्या या प्रकारावर आता प्रशासकीय आणि सार्वजनिक पातळीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे पुढील दौर्यात अधिक पारदर्शकता ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.