(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा फज्जा पुन्हा एकदा उघड झाला आहे. ग्रामीण रुग्णालयासमोरच्या संरचनेला तडे गेल्याचे नुकतेच निदर्शनास आले असून, या बांधकाम धोक्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या तड्यांमधून पावसाचे पाणी झिरपत असून, त्यामुळे भिंत अधिकच कमजोर होत आहे. सदर रचना कोसळल्यास त्यालगतचा महामार्ग रस्ता, जो आधीच नादुरुस्त असून तात्पुरत्या डागडुजीवर तग धरून आहे. तो आता पुन्हा खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
कामाची गुणवत्ता पुरती ढासळली; निसर्गच कारभार उघड करत असल्याची जनतेची भावना
कुरधुंडा, आरवली आणि शास्त्रीपुल परिसरातही समान प्रकारची तडे जाण्याची, रस्ता खचण्याची आणि भिंती ढासळण्याची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना मान्सूनच्या पहिल्याच सरींमध्ये उघड झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी असा आरोप केला आहे की, काम उघडं पडलं की ठेकेदार फक्त वरवरची मलमपट्टी करून जबाबदारी झटकतो आहे. तडे गेलेल्या ठिकाणी सिमेंटचं लेपन करून फोटो काढले जातात, पण अंतर्गत दोष दडवले जातात. “फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचा हा प्रकार” असल्याचे नागरिक संतप्तपणे सांगत आहेत.
“राष्ट्रीय” दर्जा असलेल्या महामार्गाची अधोगती?
बावननदी ते आरवली दरम्यानचा महामार्ग, जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत येतो तो दर्जेदार आणि दीर्घकालीन वापरासाठी उभारला जाण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या घटनांनी हा महामार्ग “राष्ट्रीय” दर्जा राखू शकेल का?” असा मूलभूत प्रश्न निर्माण केला आहे.
महामार्ग हे केवळ वाहतुकीचे साधन नसून, लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवास, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आर्थिक व्यवहारांशी निगडित असल्याने, त्याच्या दर्जात कोणतीही तडजोड जनतेसाठी धोकादायक ठरू शकते.
ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करावी – नागरिकांची मागणी
या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
“प्रशासन वेळेत जागं झालं नाही, तर उद्रेक अटळ आहे,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
तातडीने पाहणी आणि दुरुस्तीचे आदेश द्या
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने घटनास्थळांची पाहणी करून बांधकामाची सखोल तपासणी करावी, आणि संभाव्य धोका ओळखून तांत्रिक समितीमार्फत स्थायिक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

