(मुंबई)
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने आज २८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली असून, यामध्ये निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
३० जून ते ७ जुलै या कालावधीत संबंधित महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अन्यथा पुढील फेरीत प्रवेशाचा अधिकार गमावण्याची शक्यता आहे, असा इशारा शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला आहे.
पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला आणि सुधारित वेळापत्रकानुसार ती ३० जूनला अपेक्षित होती. मात्र, २८ जून रोजीच यादी प्रसिद्ध करण्यात आली असून १ ते ७ जुलै दरम्यान प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी आपले लॉगिन https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर करून कॉलेज अलॉटमेंट तपासावे आणि आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात जाऊन प्रवेश पूर्ण करावा.
शाखेनिहाय विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रवेशाची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
विज्ञान शाखा:
अर्जदार – 6,09,718
प्रवेश मिळाले – 3,42,801
वाणिज्य शाखा:
अर्जदार – 2,23,931
प्रवेश मिळाले – 1,39,602
कला शाखा:
अर्जदार – 2,31,356
प्रवेश मिळाले – 1,39,791
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्यांना प्रवेश ‘आवश्यक’
यंदा ४,५७,८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर – ७७,०९९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, ३६,९०१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले की, “पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न केल्यास पुढील फेरीसाठी अर्ज करता येणार नाही.”
१२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज; प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू
दहावीचा निकाल लागून दीड महिना उलटल्यानंतरही प्रवेश यादी न जाहीर झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांत अस्वस्थता होती. मात्र, आता यादी जाहीर झाल्याने पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.
या विद्यार्थ्यांनी महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदवले होते. आता पहिल्या फेरीनंतर रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करून दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
टीप:
✓ पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश रद्द करता येणार नाही
✓ वेळेत प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीसाठी पात्रता रद्द होईल