(मुंबई)
शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षकांसाठी आवश्यक असलेली अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (TAIT) २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० मे आहे.
पवित्र संकेतस्थळाद्वारे राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ही परीक्षा IBPS संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. उमेदवारांना ही परीक्षा मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तीन माध्यमांतून देता येईल. परीक्षेचे एकूण २०० गुण असून, त्यापैकी १२० गुण अभियोग्यतेसाठी आणि ८० गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. परीक्षेचा एकूण कालावधी २ तासांचा असेल.
महत्त्वाच्या सूचना:
-
अर्ज करताना उमेदवाराने आपले नाव आधार कार्डावरील नावाप्रमाणेच भरावे. नावात तफावत आढळल्यास परीक्षेला बसण्यास परवानगी दिली जाणार नाही.
-
परीक्षेच्या किंवा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे.
-
ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड अनिवार्यपणे करावी.
परीक्षा शुल्काबाबत:
-
सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी शुल्क ९५० रुपये
-
राखीव गटातील उमेदवारांसाठी शुल्क ८५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक (मराठी आणि इंग्रजी) स्वरूपात उपलब्ध असतील, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.