(मुंबई)
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लवकरच बदल होणार असून, विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती निश्चित झाली आहे.
रवींद्र चव्हाण हे ३० जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, १ जुलै रोजी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने वरळीतील डोम सभागृहात १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यभर अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते, आणि आता त्यावर औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत सर्व तयारी पूर्ण झाली असून, रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीला भाजपच्या आगामी रणनीतीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवड निर्णायक ठरू शकते.