(मुंबई)
सध्या महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना (१९८८ बॅच) यांची लवकरच राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होणार आहे. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळविणाऱ्या सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच सोमवारी ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मंत्रालय प्रशासनाला सध्या नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले असून याजागी सेवा ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार मीना यांच्या नावावरच सरकार दरबारी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. सुजाता सौनिक यांनी डॉ. नितीन करीर यांच्याकडून ३० जून २०२४ रोजी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली होती.
राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल (१९८९ बॅच) आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (१९९० बॅच) हेदेखील शर्यतीत होते. मात्र, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती दिल्याचे समजते.
राजेशकुमार यांना मिळणार केवळ ६० दिवस
१९८८ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले राजेशकुमार मीना हे ऑगस्ट २०२५ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट या जेमतेम दोन महिन्यांचाच कालावधी असणार आहे. परंतु, दरम्यानच्या काळात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यास राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी किमान ३ महिने मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी अजोय मेहता, डॉ. नितीन करीर या दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर राहण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे राजेशकुमार मीना यांच्याबाबतही असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्याचे नवे मुख्य सचिव कोण असावेत, याचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राज्यात पुढील ६ महिन्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाला गती देण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्याच्या नावावर मुख्य सचिव म्हणून शिक्कामोर्तब करू शकतात. राजेशकुमार मीना हे प्रशासनात सध्या सर्वात ज्येष्ठ असून त्यांना कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. सध्या ते महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सेवा ज्येष्ठतेचा निकष पाळून राजेशकुमार मीना यांच्या नावालाच हिरवा कंदील दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. राजेशकुमार मीना यांच्यानंतर अतिरक्त मुख्य सचिव (गृह) इकबालसिंह चहल (१९८९ बॅच) यांचा क्रमांक आहे. चहल हे जानेवारी २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार विद्यमान मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (१९९० बॅच) यांचा क्रमांक असून ते मार्च २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत.