(मथुरा / प्रतिनिधी)
भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र गोवर्धन पर्वताच्या साक्षीने दहा हजार समर्थ सेवेकऱ्यांच्या भागवत पारायणात श्रद्धा, भक्ती, प्रेम,आणि उत्साह यांचा अपूर्व संगम दिसून येत असून लड्डू गोपाल की जय, राधे राधे आणि स्वामीनामाच्या जयघोषामुळे संपूर्ण गोवर्धन नगरी दुमदुमून गेली आहे. पारायणाच्या दुसऱ्या दिवसाचे वाचन आणि विविध सेवा अत्यंत श्रद्धेने तितक्याच आनंदाने पार पडल्या.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे राष्ट्रहितासाठी भगवान श्रीकृष्णाची पवित्र नगरी गोवर्धन येथील कार्ष्णि आश्रमाच्या प्रांगणात २७ जून पासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाला प्रारंभ झाला. राष्ट्रावरील अरिष्टे टाळावीत त्याचबरोबर समर्थ सेवेकरी आणि सकल समाजाचे कल्याण व्हावे या उदात्त भावनेतून परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वोच्च सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुमाता सौ मंदाकिनीताई मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताहाला प्रारंभ झाला.
सेवेकऱ्यांसाठी नारायण कवच धारण विधी..
सप्ताह काळात दररोज वेगवेगळ्या विशेष सेवा आणि उपक्रम घेण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी पितृतर्पण, प्रधान संकल्प, पारायणाला प्रारंभ आणि त्यावर निरूपण झाले तर शनिवारी (२८ जून) सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भागवताचे पठण झाल्यावर समर्थ सेवेकऱ्यांच्या संरक्षणासाठी नारायण कवच धारण विधी पार पडला.उद्या रविवारी (२९जून) संतान गोपाळ मंत्रानुष्ठान आणि श्रीकृष्ण दोलोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
भागवत कथेचे श्रवणीय रसाळ निरूपण…
श्रीमद् भागवत पारायण करताना केवळ पठण करून चालत नाही तर त्याचे निरूपणही श्रवण करणे गरजेचे असते. सेवामार्गाचे याज्ञिकी श्री. दीपकशास्त्री मुळे हे भागवत कथेचे निरूपण ओघवत्या शैलीत करीत आहेत. संपूर्ण सप्ताहामध्ये मुळे शास्त्री निरूपणाची सेवा करणार असून त्याकरिता भव्य व्यासपीठावर व्यास गादी तयार करण्यात आली आहे. दुपार सत्रात निरूपण आणि विशेष सेवा व उपक्रम घेण्यात येतात. सायंकाळी महाआरती झाल्यानंतर गीताई आणि विष्णुसहस्र नामावलीचे पठण केले जाते. सात्विक भोजन, निवास व्यवस्था आणि कार्यक्रमाचे उत्तम नियोजन यामुळे सहभागी झालेल्या समर्थ सेवेकऱ्यांनी समाधानाची भावना व्यक्त केली.