(मुंबई)
राज्यात हिंदी सक्तीविरोधात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जुलैला एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी हे दोघेही पुन्हा मैदानात उतरत असल्याने, या हालचालींनी भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे, मराठी जनमत भाजपविरोधात वळू नये, म्हणून नवीन रणनीती आखण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे.
हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा
राज्यात प्राथमिक शिक्षणातून हिंदीची सक्ती करण्याच्या हालचालींविरोधात मराठीप्रेमी जनतेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधूंनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी येत असून, भाजपवर “मराठीची गळचेपी” केल्याचा आरोप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपची रणनीती: ‘मराठी अभिजात भाषा’चा मुद्दा समोर
या मोर्चाच्या संभाव्य राजकीय परिणामांची जाणीव असल्याने भाजपने याला तोलण्यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा मुद्दा पुढे रेटण्याची तयारी केली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत, यावर संपूर्ण प्रचार मोहिम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाकडून सांगण्यात येत आहे की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका निर्णायक होती, आणि हे यश जनतेसमोर मांडण्यात येईल.
ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचाही सहभाग अपेक्षित असल्याची चर्चा आहे. या एकत्र येणाऱ्या शक्तीमुळे महायुती सरकारसमोरील अडचणी वाढू शकतात, अशी भीती काही भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.
भाजप आमदारांचा प्रतिवाद
या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, “मराठी भाषेला आम्ही बोटदेखील लावू देणार नाही. हे आमच्या महायुती सरकारचं वचन आहे. ठाकरे बंधूंच्या आंदोलनामागे केवळ निवडणूकपूर्व भुलथापा आहेत. मराठी माणसाला दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून, खरी साथ आजही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचीच आहे.”
मराठी भाषा आणि हिंदी सक्तीचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी उभा राहत असल्याने, हे आंदोलन राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरू शकते. भाजपने भाषाविषयक वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला असला, तरी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो आणि भाजपची रणनीती कितपत यशस्वी होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.