(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या जयश्री गायकवाड यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली असून, त्यांना राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्तपदी बढतीने नियुक्ती मिळाली आहे. त्यांच्या जागी आता बुलढाणा येथील बाबुराव महामुनी हे रत्नागिरीत अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
गायकवाड यांनी मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्ह्यात कडक शिस्त, अभ्यासू दृष्टिकोन आणि प्रभावी नेतृत्व यामुळे एक वेगळी छाप निर्माण केली होती. बारसु प्रकल्पासारख्या संवेदनशील बंदोबस्तासह अनेक गुन्हेगारी अनुषंगाने त्यांनी अचूक आणि दक्ष कारभार केला. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पोलिस दलासह नागरिकांमध्येही सकारात्मक दृष्टी निर्माण झाली होती. अत्यंत शांत, परंतु ठाम भूमिका घेणाऱ्या आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायकवाड यांच्या बदलीची बातमी समजताच रत्नागिरीत अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, त्याचबरोबर त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छांचा वर्षावही होऊ लागला आहे.
गायकवाड यांची प्रशासकीय दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि लोकसंपर्कातील पारदर्शकता हे गुण रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासाठी एक आदर्श ठरले होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती राज्याच्या गुप्तवार्ता विभागात केवळ बढती नसून, त्यांच्या क्षमतेवर ठेवलेला विश्वास म्हणून पाहण्यात येत आहे.नवनियुक्त अधिकारी बाबुराव महामुनी यांच्याकडून आता जिल्ह्याच्या पोलीस प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.