(रत्नागिरी)
मुसळधार पावसानंतर आता जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, सिव्हिल हॉस्पिटलसह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी वाढली आहे. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी-खोकला, उलट्या-जुलाबाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात विविध संसर्गजन्य आजारांची साथ पसरते. यंदाही पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर हवामानात झालेल्या बदलामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, याचा परिणाम म्हणून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, टायफॉईड, कावीळ, गोवर, कांजण्या, कॉलरा यांसारखे आजार पसरत आहेत. रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ओपीडी रोज हाऊसफुल्ल होत असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची झुंबड उडाली आहे.
सावधगिरी हाच उपाय
साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे, पाणी उकळून पिणे, डासांपासून संरक्षण करणे, तसेच लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. प्रशासनानेही नागरिकांनी स्वतःची आणि घरच्यांची आरोग्यदृष्टीने काळजी घ्यावी.