(रत्नागिरी)
शहरातील साळवी स्टॉप परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील चार दिवसाच्या नवजात बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बालिकेची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला प्रथम खासगी रुग्णालयात, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील एसएनसीयू विभागात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणाऱ्यांच्या स्त्री जातीच्या चार दिवसाच्या बालिकेला शौचास झाल्यानंतर तिच्या नाकातून लालसर फेसयुक्त द्रव बाहेर पडू लागला. तसेच शरीराची त्वचा पिवळसर दिसू लागल्याने तिला तातडीने निर्मल बालरुग्णालय, साळवी स्टॉप येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी तीच्यावर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलच्या नवजात बालकांच्या विशेष निगा विभागात (एस.एन.सी.यु) सायंकाळी ८ वाजता भरती करण्यात आले.
डॉक्टरांकडून तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्रौ ८.४० वाजता बालिकेला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्र. ६२/२०२५) भारतीय न्याय संहिता १९४ नुसार करण्यात आली आहे.