(रत्नागिरी)
शहरातील आरोग्य मंदिर पिकअप शेडजवळ १५ जून रोजी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह पाच जण जखमी झाले असून, निष्काळजीपणे रिक्षा चालवणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर तब्बल १० दिवसांनी गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अजित अरविंद वाडकर (वय ५२, रा. आदर्श वसाहत, कारवांचीचाडी, रत्नागिरी) हे रिक्षा (क्रमांक एम.एच.०८ के ४४१९) हयगयीने चालवत होते. रिक्षामध्ये चार प्रवासी होते. त्यांनी रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असताना रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकी (अॅक्टीवा क्र. एम.एच.०८ ए.एफ. ६००६) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी होऊन गंभीर अपघात घडला.
या अपघातात दुचाकीवरील चालक सलहान सुलेमान दर्वे, मागील प्रवासी अजमल खालीद मजगांवकर तसेच रिक्षामधील प्रवासी विनोद शंकर धनावडे, तेजस विनोद धनावडे, कार्तिक किरण घेवडे आणि रिक्षाचालक अजित वाडकर हे सर्वजण जखमी झाले. दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी ईशिता रूपेश पाडावे (वय ३६, रा. मपोहेकों/७०, रत्नागिरी) यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (मु.र.नं. २७३/२०२५) दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), मोटार वाहन कायदा कलम १८४, १२५/१८७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.