(रत्नागिरी)
दाभोळ परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा आणि भरमसाठ वीजबिलांच्या तक्रारींमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावना व्यक्त करत शिवसेनेने आज (गुरुवार) महावितरण कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरणच्या अनियमित कारभारामुळे त्रस्त जनतेचा आवाज बुलंद करत शिवसैनिकांनी कार्यालयात धडक दिली.
गेल्या काही दिवसांपासून दाभोळमध्ये दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यासोबतच नियमित वीजपुरवठा होत नसतानाही काही जणांना १० ते १५ दिवस लाईट नसतानाही भरमसाठ बिले आल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधिकारी श्री. विवेक येलवे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नियंत्रण कक्षातील अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी कोण ऐकणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
शिवसेनेने यावेळी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “त्वरित उपाययोजना न झाल्यास आणि वीजपुरवठा नियमित न केल्यास शिवसेना जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल.” यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आणि येत्या काळात तातडीने सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले.
दाभोळमधील नागरिक आणि स्थानिक संघटनांचा संयम सुटू लागला असून, वीजपुरवठा आणि ग्राहक सेवेशी संबंधित तक्रारींवर महावितरणने आता तरी गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.