(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे निघाले असताना त्यांच्या प्रवासाला अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी एसटी महामंडळाने मोठे नियोजन आखले आहे. यंदा राज्यभरातून तब्बल ५ हजार ३०० एसटी बस विविध मार्गांवर धावणार असून, रत्नागिरी आगारातून सुमारे ५० जादा बस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आहेत. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत एसटी महामंडळाने आगाऊ नियोजन सुरू केले आहे. मागील वर्षी रत्नागिरीतून ३० बस सोडण्यात आल्या होत्या. यंदा त्यात वाढ करून ५० बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे.
रत्नागिरी आगार प्रशासनाने भाविकांना जास्तीत जास्त बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून बसची संख्या निश्चित करता येईल. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा शेजारील राज्यांतीलही भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखकर व सुरळीत होण्यासाठी एसटी महामंडळ विशेष प्रयत्न करत आहे. भाविकांनी वेळेवर तिकीट आरक्षण करून सहकार्य करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.