(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तिवरे तर्फे देवळे येथील एक तरुण काजळी नदीवरील काँजवेवरून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी घडली. दिपक अंकुश गोरूले (वय ३९) असे मृत तरुणाचे नाव असून, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
साखरपा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे काजळी नदी दुथडी भरून वाहत आहे. याच दरम्यान दिपक गोरूले कामानिमित्त साखरपाला गेला होता. सायंकाळी परतताना कोंडगावजवळील काजळी नदीवरील काँजवे ओलांडत असताना तो पाण्यात पडून वाहून गेला. काही वेळातच ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यानंतर प्रदीप रामाने, शशिकांत गोरूले, वैभव कांबळे यांच्यासह स्थानिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दीपकचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या काँजवेवर यापूर्वीही जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी एक वृद्ध व्यक्ती याच ठिकाणी वाहून गेला होता, तर दोन वर्षांपूर्वी दोन मुलींचा अपघात होता होता वाचला होता. त्यामुळे ‘हा काँजवे अजून किती बळी घेणार?’ असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. कोंडगावजवळील काजळी नदीचे पात्र मोठे असून पावसाळ्यात नदीला पूर येतो. मात्र, सध्या अस्तित्वात असलेला काँजवे उंचीने कमी असून, पाणी वाहून नेण्यासाठी बसवलेले पाईप अपुरे आहेत. त्यामुळे पूरस्थितीत पाणी काँजवेच्या पातळीवरूनच वाहत जाते आणि त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात येतात.
ग्रामस्थांकडून या ठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. या पुलामुळे ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल कमी होतील, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पावसाळा संपताच या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असेही आवाहन ग्रामस्थांनी प्रशासनाला केले आहे.