(रत्नागिरी)
भाटये समुद्रकिनारी मुळे काढण्यासाठी गेलेल्या एका युवकाच्या बेपत्ता होण्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली असून, संबंधित युवकाचा अद्याप शोध लागलेला नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील खडपे वठार येथील काही युवक मुळे काढण्यासाठी भाटये किनारी गेले होते. याच दरम्यान, त्यातील एक युवक समुद्राच्या पाण्यात उतरला असताना खवळलेल्या लाटा आणि खोलवर गेल्याने तो अचानक अदृश्य झाला. काही वेळ तो पाण्यात बसल्याचे इतरांनी पाहिले होते, मात्र त्यानंतर तो दिसेनासा झाला.
घटनेनंतर तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली असून स्थानिक नागरिक, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले होते. समुद्रातील लाटांचा जोर अधिक असल्याने शोध मोहीमेस अडथळे येत होते. युवकाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तो लवकरात लवकर सापडावा, यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरीमधील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर सध्या मुळे सापडत असल्याने खवय्यांनी मुळे पकडण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ही बातमी सगळीकडे पसरताच अनेक जण समुद्राकडे धाव घेत आहेत. हे मुळे निळ्या रंगाचे असतात म्हणून स्थानिकांनी त्याला चायना मुळे असे नाव ठेवले आहे. कोकणात जसे तसरे मुळे सापडतात तसेच हे मुळे आहेत. मात्र त्यांचा रंग निळा व शिंपल्यांना चकाकी असल्याने स्थानिक लोकांनी त्याला चायना मुळे नाव ठेवले आहे.
मासळीबाजारातही मासेविक्रेत्या महिला हे निळ्या रंगाचे मुळे 100 ते 150 रूपये या दराने विकतात. चायना मुळे भाट्ये समुद्र किनारी सापडत असल्याची बातमी सर्वत्र पसरल्याने अनेकजण आपला जीव धोक्यात घालून समुद्रात उतरत आहेत.