( रत्नागिरी )
शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, मोकाट फिरणारी जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास यामुळे नागरिक हैराण झाले असून, या समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने मंगळवारी (२५ जून) नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात मारुती आळी, तांबट आळी, तेली आळी नाका व अन्य अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या पावसाचे आगमन झाले असतानाही हे खड्डे चिरा-डबर न टाकता पावसाळी डांबराने भरले जात नसल्याने ते अधिक धोकादायक बनले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिक आणि वाहनचालक दोघांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यासोबतच शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यांवर मुक्तपणे फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या समस्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
“शहरातील नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. प्रशासनाने या समस्या मार्गी लावण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड, माजी नगरसेविका सौ. राजश्री शिवलकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.