(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली गवळीवाडा परिसरातील एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ५३९ ग्रॅम वजनाचा गांजा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपीकडून एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात जहीर मेहमूद काजी (वय ४५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करी व साठवणूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जून रोजी ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक मिशन कॅम्प ते गवळीवाडा रोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीअंती त्याच्या ताब्यातील पिशवीतून हिरवट-काळपट रंगाचा, उग्र वासाचा गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला. पंचासमक्ष तपासणीदरम्यान या गांजाचे वजन ५३९ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले.
संशयित आरोपीकडून अंदाजे १५ हजार किमतीचा गांजा व इतर मिळून एकूण ६५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कामगिरी स.पो.नि. प्रमोद वाघ, पो.उनि. ओगले, पोहवा. शांताराम झोरे, पोहवा. बाळू पालकर, पोहवा. अमित कदम, पोहवा. योगेश नार्वेकर, पोहवा. योगेश शेट्ये, म. पोहवा. वैष्णवी यादव यांनी केली.