(रत्नागिरी)
उत्पादन शुल्क विभागाच्या २००३ सालच्या आकृतिबंधात २१ वर्षांनंतर बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच उपविभागांपैकी दोन उपविभाग अन्य दोन उपविभागांना जोडले जाणार आहेत. तसेच आता तयार झालेल्या तीन निरीक्षकांकडे प्रत्येक तीन उपनिरीक्षक दिले जाणार आहेत. याची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरीकार्यालयाच्या अंतर्गत २००३ च्या आकृतिबंधानुसार खेड, चिपळूण, लांजा, रत्नागिरी ग्रामीण आणि रत्नागिरी शहर असे पाच उपविभाग कार्यरत होते. खेडमध्ये खेड, दापोली, मंडणगड हे तीन तालुके, चिपळूणमध्ये चिपळूण, संगमेश्वर आणि गुहागर या तीन तालुक्यांचा, रत्नागिरीत शहर आणि ग्रामीण, तर लांजामध्ये राजापूर तालुक्याचा समावेश होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पूर्वीच्या या आकृतिबंधात बदल केला आहे. आता नव्या आकृतिबंधानुसार, पाच उपविभागांची रचना आता तीन उपविभागांमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार खेड, चिपळूण आणि रत्नागिरी असे तीनच उपविभाग राहणार आहेत.
रत्नागिरीमध्ये शहर आणि ग्रामीण तसेच लांजा आणि राजापूर यांचा समावेश केला आहे. परवान्यांची संख्या कमी झाल्याने काही उपविभाग बंद करून ते रत्नागिरीला जोडले आहेत. तसेच या पाच विभागांसाठी पूर्वी तीनच निरीक्षक होते आणि प्रत्येकाकडे केवळ दोनच उपनिरीक्षक पदे होती. त्यामुळे त्यांच्या अखत्यारित असलेल्या उपविभागांमध्ये परवान्यांची कामे किंवा तपासणी करताना अडचण येत होती. नव्या आकृतिबंधानुसार रत्नागिरी ग्रामीण, शहर आणि लांजा, राजापूर हा उपविभाग एकच करण्यात आला आहे. तसेच आता असलेल्या तीन उपविभागांना एक निरीक्षक मिळणार आहे. तसेच त्याच्याकडे तीन उपनिरीक्षक दिले जाणार असल्याने प्रत्येकाकडे एका तालुक्याचा भार राहणार आहे.