(नवी दिल्ली)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, २०२६ पासून इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या बदलावर विचारमंथन सुरू होते आणि अखेर आज (बुधवार) CBSE कडून अधिकृत घोषणाही करण्यात आली.
दोन टप्प्यांतील परीक्षा – अधिक संधी, अधिक तयारी
CBSE च्या माहितीनुसार, दहावीची पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दुसरी परीक्षा मे महिन्यात होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अनिवार्य असणार असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ‘पर्यायी’ असेल. विद्यार्थ्यांना जर पहिल्या परीक्षेत समाधानकारक गुण मिळाले नाहीत, तर त्यांना दुसऱ्या परीक्षेत बसून गुण सुधारणे शक्य होणार आहे. गुण सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त संधी मिळणार आहे, हे या निर्णयाचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे.
निकाल व मूल्यांकनाची प्रक्रिया कशी असेल?
पहिल्या टप्प्याचा निकाल एप्रिल महिन्यात, दुसऱ्या टप्प्याचा निकाल जून महिन्यात जाहीर केला जाणार आहे. CBSE ने स्पष्ट केले आहे की, वर्षात कितीही परीक्षा दिली तरी अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment) फक्त एकदाच होणार आहे. याशिवाय संबंधित विषयांतील प्रात्यक्षिक परीक्षा (practical exam) देखील एकदाच घेतली जाणार आहे.
परीक्षा केंद्र आणि शुल्क याबाबतचे नियम
CBSE ने दोन्ही परीक्षांसाठी एकच परीक्षा केंद्र देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील पर्यायी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
नवीन बदलामुळे काय लाभ होणार?
CBSE चा उद्देश असा आहे की, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करणे आणि त्यांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी दुसरी संधी उपलब्ध करून देणे. यामुळे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ही परीक्षा पद्धत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत सुचवण्यात आलेल्या सुधारणा आणि लवचिक शिक्षणपद्धतीचा एक भाग आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.