(मुंबई)
विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या ७६ लाख मतदानावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आंबेडकर यांना मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी सोमवारी दिवसभर सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर बुधवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ डॉकटर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळण्याचा निर्णय दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेद्वारे असा दावा केला होता की, विधानसभा निवडणुकीच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर तब्बल ७६ लाख मतदानाची आकडेवारी वाढली. विशेष म्हणजे, १९ मतदारसंघांमध्ये हे मतदान अनैसर्गिकरित्या वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. अचानक एवढे मतदान कसे झाले, याचा सविस्तर तपशील निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
मात्र, या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, “संपूर्ण दिवसभर युक्तिवाद ऐकावा लागला आणि त्यामुळे आमचा कामकाजाचा वेळ वाया गेला.” अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि याचिका फेटाळली. या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.