( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
शहराजवळील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील रस्त्याची अवस्था अक्षरशः दयनीय झाली असून रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. वाहने तर कसाबसा मार्ग काढत असली तरी प्रवाशांना बसणारा दणका असह्य ठरत आहे. या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमध्ये एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होईल का? असा संतप्त सवाल खड्डे पाहून उपस्थित होत आहे.
मंत्र्यांचा दौरा ठरला, की चर्मालय-कोकणनगर मार्गावर चमत्कार घडतो. काही तासांपूर्वीपर्यंत मृत्यूचे आमंत्रण वाटणारा रस्ता अचानक काळाकुट्ट डांबराने झाकला जातो. खड्ड्यांवर थरथरीत डांबराचा थर चढतो आणि ‘चकाचक’पणा फुलतो, मात्र, हा मेकअप फक्त काही तासांचा असतो. मंत्री निघून गेले, की डांबरही हळूहळू गायब होतो आणि पुन्हा जुन्या अवस्थेतील खड्डे आपली जागा सांगून देतात. त्यामुळे प्रशासनाचे हे डांबरसंधान केवळ देखाव्यापुरते असल्याचे स्पष्ट दिसते. लोकांच्या सुरक्षेपेक्षा मंत्र्यांची दृष्टी वळेल, तो तास महत्त्वाचा! अशी बोचरी टीका वाहनचालकांमधून होत असते.
हा मार्ग काही गावांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर ये- जा करत असताना खड्ड्यात गाडी गेली की ती वर येईलही, पण गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या मणक्याला बसणारा धक्का त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करत आहे. काही ठिकाणी खड्डे इतके खोल आहेत की ते मृत्यूचे सापळेच वाटतात. पावसात खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डे लपतात यातून अपघाताची शक्यता निर्माण होते. रात्रीच्या अंधारात रस्ता अधिकच धोकादायक होतो. पण संबंधित यंत्रणा मात्र बिनधास्त झोपल्याचे सोंग घेऊन असल्याचे चित्र आहे.
चर्मालय ते कोकणनगर हा रस्ता शाळकरी मुले, कार्यालयीन कर्मचारी, वृद्ध नागरिक आणि रुग्णवाहिका यांचा दैनंदिन मार्ग आहे. अशा जीवघेण्या अवस्थेतील रस्त्यांवरून प्रवास म्हणजे दररोजच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. संबंधित प्रशासनाकडून या समस्येकडे डोळेझाक न करता तत्काळ रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांसह प्रवासी वर्गातून केली जात आहे.