( रत्नागिरी )
शहरातील रस्त्यांवर मुक्तपणे फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्न आता अधिक गंभीरपणे हाताळण्यात येणार आहे. याबाबत ठोस पावले उचलण्याचा इशारा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
“शहरात सध्या दिसणारी बहुतांश जनावरे मोकाट नसून, त्यांना मालक आहेत. या जनावरांच्या मालकांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व मालकांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीनंतरही जर जनावरांचे प्रमाण तसेचच राहिले, तर संबंधित मालकांवरच गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल,” असे स्पष्ट संकेत सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मोकाट जनावरांवरील उपाययोजनांच्या अनुषंगाने बोलताना सामंत म्हणाले, “या विषयावर राज्यात कार्यरत असलेल्या एका संस्थेसोबत बैठक घेण्यात आली असून, लवकरच या संस्थेकडून सविस्तर आराखडा सादर केला जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरीत पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येईल.”
सध्या जनावरे आणि त्यांचे मालक यांची नोंदणी पूर्ण झाली असून, पुढील पंधरा दिवसांत संबंधित मालकांना नोटीस देत थेट संवाद साधण्यात येणार आहे. मात्र, सूचना दिल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्यास तहसील कार्यालय, पोलिस प्रशासन व पशू संरक्षण कायद्याअंतर्गत थेट गुन्हे नोंदवण्यात येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.