( रत्नागिरी )
कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्याच्या जिल्ह्यांना उंच लाटांचा धोका व हवामानाची तीव्रता लक्षात घेता २५ जूनपर्यंत सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) ने सोमवारपासून बुधवार (२५ जून) रात्री ८.३० वाजेपर्यंत कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा जारी केला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह पुणे व सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा दिला आहे. समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून लहान होड्यांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली असून, मासेमारीसाठी जाणाऱ्यांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने अजूनही पूर्णतः जोर धरलेला नसून, पावसाच्या केवळ सरी कोसळत आहेत. हवामान खात्यानुसार, पावसात सातत्य निर्माण होण्यासाठी अजून वेळ लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याची पूरपरिस्थिती नियंत्रणात असून, प्रशासन सतर्क असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.