(रत्नागिरी)
उदय सामंत प्रतिष्ठान वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना या क्षेत्रातले सामाजिक कामाचे सातत्य राखून आहे. नामदार उदयजी सामंत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य या जोरावरच या प्रतिष्ठानचे वैद्यकीय क्षेत्रातले काम लक्षणीय ठरत आहे.
या कामातून कोणत्याही मोठ्या प्रसिद्धीच्या मागे न धावता गेली काही वर्ष हे काम समाजाच्या प्रती एक कर्तव्य भावना या उदात्त हेतूने सुरू आहे.
उदय सामंत प्रतिष्ठान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभाग कर्मचारी, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय या सर्वांच्याच सहकार्याने आयोजित मोफत २ डी इको कॅम्पसाठी बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील प्रसिद्ध पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ श्रीपाल जैन यांची उपस्थिती लाभली. या कॅम्पमध्ये डॉ जैन यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ मुलांची तपासणी केली. या कॅम्प मध्ये १५ दिवसाच्या बाळापासून १५ वर्षाच्या मुलाची २ डी इको तपासणी झाली. या तपासणी नंतर १८ मुलांसाठी पुढील उपचारासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे आणि ८ मुलांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. प्रतिष्ठान तर्फे पुढील उपचाराचे नियोजन करण्यात येणार आहे.
कॅम्प ला आलेल्या लहान मुलांना डीन डॉ रामनंदन आणि सिव्हिल सर्जन डॉ जगताप यांनी खाऊ वाटप केले. तसेच लहान मुलांना घेऊन आलेल्या पालकांसमवेत संवाद साधून त्यांना धीर देखील दिला. प्रतिष्ठान तर्फे कॅम्प ला आलेल्या सर्वांना पाणी, नाश्ता, जेवण या सर्व सुविधा देऊन प्रत्येकाची काळजी देखील घेतली गेली.
आतापर्यंत प्रतिष्ठानतर्फे लहान मुलांसाठीचे एकूण ५ २डी इको कॅम्प आयोजित केले गेले होते. ज्यामधून किमान ४५५ मुलांची तपासणी आणि ४१ सर्जरी करण्यात आल्या.
प्रतिष्ठान तर्फे आयोजित कॅम्प मध्ये नेहमीच तज्ञ डॉक्टर यांचे मार्गदर्शन घेतले जाते आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होत आहे.
या अगोदरच्या झालेल्या कॅम्पमध्ये सहभागी झालेले डॉ सौरभ लिमये हे लांजा तालुक्याचे सुपुत्र असून त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयुएचएस) च्या डीएम कार्डिओलॉजी या अंतिम परीक्षेत राज्यात प्रथम येत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या वैद्यकीय शैक्षणिक परंपरेत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डीएम कार्डिओलॉजी ही वैद्यकीय क्षेत्रातील एक उच्चतम वैद्यकीय पदवी मानली जाते. या क्षेत्रातील परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळविणे ही एक अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते. प्रचंड मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याच्या जोरावर डॉ. सौरभ लिमये यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. दरम्यान, डॉ. सौरभ लिमये यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
डॉ सौरभ हे लांजा येथील जुन्या काळातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. य. दा. लिमये यांचे नातू आहेत. तसेच रत्नागिरी शहरातील त्या काळातील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर कै. मोहनराव दिवेकर यांचेही नातू आहे. डॉ सौरभ यांनी डीएम कार्डिओलॉजी रेसिडेन्सी लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, सायन मुंबई येथून पूर्ण केले आहे.