( रत्नागिरी )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा २४ जूनपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ नुसार या संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार २४ जून ते १४ जुलै २०२५ या कालावधीत, रोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत, प्रत्येक परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात शांतता भंग करणारी कोणतीही कृती करण्यात येणार नाही. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्राच्या आसपासचे एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण यंत्रणा ही परीक्षा काळात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, फॅक्स, ई-मेल वा इतर कोणतीही प्रसारमाध्यमे घेऊन येण्यास मनाई आहे.
कोणतीही व्यक्ती परीक्षेच्या कार्यात अडथळा निर्माण करील, असे कोणतेही कृत्य करू शकणार नाही. तसेच केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा वाहनास प्रवेश नाकारण्यात येणार आहे. मात्र परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्यांना त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्यासाठी या आदेशातून वगळण्यात आले आहे. तथापि, अधिकारी वा कर्मचारी यांनीही गैरप्रकार टाळावेत, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.