( रत्नागिरी )
कोकण रेल्वेच्या कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजरंग भगवानाराम लेगा (वय २४, रा. चाऊ, ता. व जि. नागौर, राजस्थान) असे फिर्यादीचे नाव असून, ते गाडी क्रमांक २०११२ अप कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेसच्या इंजिनकडील जनरल डब्यातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते आपली सिट पकडून झोपले होते. त्याचदरम्यान त्यांच्या उजव्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेला मोबाईल ‘सॅमसंग’ कंपनीचा असून त्याची किंमत अंदाजे २० हजार रुपये आहे. मोबाईलचा रंग जांभळा होता.
ही घटना १७ जून रोजी रात्री ८.५० ते १०.५० च्या दरम्यान कणकवली ते रत्नागिरी रेल्वे स्थानक दरम्यान घडली. सदर गुन्हा २० जून रोजी दुपारी २.०५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत असून, रेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.