(फुणगूस / एजाज पटेल)
‘गाव तेथे रस्ता’ हे सरकारचे धोरण आणि ‘रस्ता तेथे एसटी’ हे एसटी महामंडळाचे ब्रीद वाचायला छान वाटते, पण प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये ही फक्त घोषणा उरते. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावाची कातळवाडी हे त्याचे जिवंत उदाहरण. येथे रस्ता आहे, पण अद्यापही एसटी बस पोहोचलेली नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून साडेसात दशके उलटून गेली, तरीही या वाडीतील लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण एसटीच्या प्रत्यक्ष सेवेच्या प्रतीक्षेत आहे.
1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि त्याच अनुषंगाने 1948 मध्ये बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) 1 जून 1948 पासून कार्यरत असून ‘गाव तेथे एसटी’ हे धोरण राबवले गेले. पण दुर्दैव असे की आज 2025 मध्ये देखील कातळवाडीसारख्या दुर्गम वाडीपर्यंत एसटीची चाके पोहोचलेली नाहीत.
विकासाच्या नावाखाली विस्मृती
कातळवाडी ही सुमारे 125 लोकसंख्येची डोंगर उतारावर वसलेली वाडी. येथून फुणगूस मुख्य थांब्यापर्यंत सुमारे 6–7 किमीचा खडतर डोंगर रस्ता आहे. रस्ता असूनही एसटी सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी डोंगरदऱ्या, रानवाटा पार करत पायपीट करावी लागते. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो – आजारी व्यक्ती, वृद्ध, गर्भवती महिला – सगळ्यांना केवळ पायावरच् अवलंबून जगावं लागतं.
खाजगी वाहनांची मदत घेणे शक्य असले तरी ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी बाब नाही. गरीबांच्या यातना नेहमीच मुक्याच राहतात, तर श्रीमंतांच्या गरजांवर शासनाचे लक्ष पटकन जाते, अशी भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करतात.
आश्वासनांचे बुडबुडे
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पुढारींच्या गाड्यांचे लवाजमे या रस्त्यावरून फिरतात. आश्वासनांची खैरात होते. पण निवडणुका संपतात आणि आश्वासने हवेत विरतात. ‘चायना मेड’ वस्तूसारखी ही आश्वासने – वापरा आणि विसरा – अशा प्रकारे हाताळली जातात. पुढील निवडणूक होईपर्यंत या भागाकडे कुणीही फिरकणार नाही.
शाळेचा रस्ता, पण शिक्षणासाठी संघर्ष
या वाडीतून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज पावसात, उन्हात, डोंगरदऱ्या पार करत चार ते पाच किमी पायी चालावं लागतं. घरातून निघाल्यानंतर दोन तासांची पायपीट करून शाळेत पोहोचतात आणि परतीचा प्रवास होत असतानाच संध्याकाळचा सूर्य मावळतो. शाळेत जाणं हे शिक्षणासाठी नव्हे, तर आयुष्य घडवण्यासाठीचा संघर्ष बनलेला आहे.
‘रस्ता आहे, पण एसटी नाही’ – या स्थितीला जबाबदार कोण?
रस्ता असून एसटी येत नसेल, तर असा रस्ता तरी कोणासाठी? हा प्रश्न ग्रामस्थांना सतत सतावत आहे. कधी एसटी सेवा मिळेल? की दुर्गम भागातील या वस्तीतील लोकांचे जगणे कायमच डोंगराळ आणि दुर्लक्षित राहणार?
‘कधी येईल एसटी?’
एसटी महामंडळाने ‘गाव तेथे एसटी’ हे धोरण जाहीर केलं खरं, पण आजही फुणगूस कातळवाडीला त्याचा लाभ नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, मागण्या केल्या, आंदोलनांची भाषा वापरली, पण सगळं व्यर्थ गेलं. कातळवाडीचे दु:ख हे केवळ या वाडीचे नाही, तर राज्यातील हजारो अशा वाड्यांचे आहे जिथे विकासाच्या गप्पा होतात, पण सेवा पोहोचत नाही. अशा या रस्त्यांवर एक दिवस एसटीची चाके खरोखर फिरावी, आणि तरच विकास सर्वसामान्य लोकांसाठी होतोय, असे चित्र निर्माण होईल.