(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी दरम्यान पावसाळ्याच्या पहिल्याच सरीत एक भिंत कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी पुरातत्व विभाग व ठेकेदारावर निकृष्ट दर्जाच्या कामाचे गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या डागडुजीसाठी एकूण ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सद्यःस्थितीत पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र काम सुरू असतानाच भिंत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आमदार किरण सामंत यांचा तातडीचा दौरा
घटनेची माहिती मिळताच राजापूरचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी तातडीने यशवंतगडला भेट दिली. त्यांच्या समवेत राजापूरचे तहसीलदार विकास गमरे, पुरातत्व विभागाचे अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासनातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान स्थानिक शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी आमदार सामंत यांच्या उपस्थितीतच ठेकेदार व अधिकाऱ्यांना जाब विचारला. कामाचा दर्जा, पारदर्शकता आणि प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त करण्यात आली.
स्थानिक समिती स्थापन करण्याचे निर्देश
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आमदार सामंत यांनी स्थानिक पातळीवर ५ सदस्यांची निगराणी समिती स्थापन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या समितीत नाटे आणि साखरी नाटे गावांच्या सरपंचांसह इतर तीन स्थानिकांचा समावेश असेल. कामकाज पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण राहावे यासाठी या समितीमार्फत थेट स्थानिक सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित असलेल्या यशवंतगडाचे पुनरुत्थान आदरपूर्वक आणि अत्यंत दर्जेदार व्हावे, यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण नको,” असा स्पष्ट इशारा आमदार सामंत यांनी यावेळी दिला.
शिवप्रेमींचा संताप आणि सहभागाची मागणी
घटनास्थळी उपस्थित अनेक शिवप्रेमी व ग्रामस्थांनी पुरातत्व विभागाच्या कामावर तीव्र टीका करत, यापुढे होणारे काम स्थानीयांच्या सहभागात आणि देखरेखीखालीच व्हावे, अशी मागणी केली. त्यांच्या भावना लक्षात घेता, भविष्यातील कामकाजात पारदर्शकता आणि जनसहभाग या गोष्टी अनिवार्य ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
ऐतिहासिक वारसा जपणे हे केवळ सरकारी यंत्रणांचे काम नसून लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे जागरूकता, सहभाग आणि पारदर्शकता हीच पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे.