(रत्नागिरी)
दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर अशी ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करून आपल्या रत्नागिरीचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवणारे प्रसाद देवस्थळी यांचा वॉकर्स ग्रुप आणि रत्नदुर्ग माउंटनिअर्स यांच्या सत्कार करण्यात आला. वॉकर्स ग्रुपचे प्रमुख व क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा व रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष व बांधकाम व्यावासयिक वीरेंद्र वणजू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या कार्यालयात हा कार्यालयात कार्यक्रम झाला. रत्नागिरीमध्ये धावण्याची संस्कृती रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न प्रसाद देवस्थळी यांनी केला असून त्यात चांगले यश मिळत आहे. ते रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचेही संस्थापक सदस्यांपैकी एक सक्रिय सदस्य आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट ग्रुप आणि कोकण कोस्टल मॅरेथॉन व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे प्रेरणादायी आयोजक म्हणून देवस्थळी सुपरिचित असून नुकतीच त्यांनी कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली आहे. यानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले.
सत्कारावेळी वीरेंद्र वणजू यांनी सांगितले की, कोकणच्या शौर्यगाथेचा वारसा प्रसादने जपला आणि आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन आपल्या रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. हा क्षण फक्त गौरवाचा नाही, तर पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
उद्योजक महेश गुंदेचा म्हणाले की, प्रसाद देवस्थळी यांचे हे यश आमचं सामूहिक स्वप्न आहे आणि तुम्ही ते साकार करून दाखवलं आहेत. आपण रत्नागिरीच्या मातीचा अभिमान आहात. कॉम्रेड मॅरेथॉनला रत्नागिरीतून पुढील वर्षी आणखी काही धावपट्टू नक्की पोहोचतील, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.
या वेळी तुषार खानविलकर, संजय मुटघर, विनय जांगळे, मिलिंद मिरकर, आशिष भालेकर, नितीन लाखण, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे, रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे गौतम बाष्टे, पराग सुर्वे, जितेंद्र शिंदे, किशोर सावंत, शैलेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आफ्रिकेत जसे जगभरातील धावपटू जातात तसेच जगभरातील धावपटू एक दिवस नक्की कोकणात येतील पण त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कोकणवासियांनी कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली कोकण कोस्टल मॅरेथॉन असं वर्णन प्रत्येक कोकणवासीय स्पर्धेचं करतो आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती किमान १० किमीसाठी आणि नंतर २१ किमीसाठी सहभागी व्हावे, यासाठी कोकणवासीयाना कळकळीचे आवाहन करतो.