(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने देवरुख येथे आयोजित स्नेहमेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तेली समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संताजी जगनाडे महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी, यशस्वी व्यक्तिमत्वे आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार होते. याशिवाय तालुकाध्यक्ष संतोष रहाटे, उपाध्यक्ष सुरेंद्र लांजेकर, दीपक सकपाळ, पांडुरंग रहाटे, योगेश चव्हाण, संतोष पावसकर, तुकाराम किर्वे, सौ. प्रियंका भोपळकर, सौ. मेघना रहाटे, युवक तालुकाध्यक्ष प्रविण रहाटे, तसेच राजेश झगडे, रमेश झगडे, मनोहर रहाटे, मधुरा भोपळकर, मनिषा पावसकर, सदाशिव रहाटे, सुरेश महाडिक, विजय राऊत, अविनाश आंब्रे, एकनाथ राऊत, दिलीप वनकर, श्रुती टिळेकर, जिल्हा सचिव संदीप पवार, जनार्दन रहाटे, संतोष किर्वे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजगौरव आणि विद्यार्थी सत्कार
देवरुखचे युवा रांगोळीकार विलास रहाटे, फणसट ग्रामपंचायतीचे सरपंच विजय किर्वे, वकिली परीक्षेत उत्तीर्ण झालेले दत्तप्रसाद रहाटे, राजवाडीचे पोलीस पाटील विलास राऊत आणि सुयोग रहाटे यांचा जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, सामान्य ज्ञान स्पर्धा आणि विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या तीसहून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करताना सोहम संजय रहाटे या विद्यार्थ्याने सांगितले, “तेली समाज सेवा संघ संगमेश्वर तालुकाने राबवलेले उपक्रम आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. अशा उपक्रमांमुळे आम्हाला पुढे जाण्याची उमेद मिळते.”
जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाकडे वळण्याचे आवाहन केले. “कोणतीही कला किंवा शिक्षण कमी दर्जाचे नसते. कमीत कमी खर्चात रोजगाराच्या अधिक संधी तंत्रशिक्षणातून मिळू शकतात. त्यामुळे युवकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे,” असे ते म्हणाले.
तालुकाध्यक्ष संतोष रहाटे यांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पुढील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ राऊत आणि अविनाश आंब्रे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने हे यशस्वी आयोजन करत सामाजिक ऐक्याचे उदाहरण घालून दिले.