(रत्नागिरी)
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीवर सध्या रक्ताच्या वाढत्या गरजेमुळे ताण निर्माण झाला असून, यंदा वर्षभरात तब्बल ७ हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. ही संख्या मागील तुलनेत लक्षणीय वाढलेली आहे. शासनाच्या मोफत उपचार योजनेमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली असून, त्यामुळे रक्ताची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पूर्वी वर्षभरात सरासरी ५ हजार रक्तपिशव्यांची आवश्यकता भासत होती. मात्र, मोफत उपचारामुळे आता केवळ मोफत रक्तपुरवठ्यासाठीच इतकीच मागणी निर्माण होत आहे. याशिवाय विविध अपघात, शस्त्रक्रिया, डायलिसिस, प्रसूती आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गतही रक्तपेढीकडून सतत रक्तपुरवठा केला जातो.
रक्तपेढीच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी १४० ते १५० रक्तदान शिबिरे वर्षभरात आयोजित करण्यात आली. अनेक समर्पित रक्तदाते, सामाजिक संस्था आणि राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे रक्तसंकलन अखंडितपणे सुरू आहे. रक्तदानासाठी १८ ते ६० वर्षे वयोगटातील, ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या आणि हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींना पात्रता आहे.
दापोली आणि कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आता रक्तसंकलन केंद्रे कार्यरत असून, दरमहा प्रत्येकी सुमारे ५० बॅगांचा पुरवठा येथे केला जातो. लवकरच राजापूर आणि संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयांतही रक्त संकलन सुरू करण्यात येणार आहे.
“रक्तपेढीला आवश्यकतेनुसार रक्तसंकलन शिबिरे आयोजित केली जातात. तसेच वैयक्तिक संपर्काद्वारेही दात्यांशी संवाद साधला जातो.”
– डॉ. अर्जुन सुतार, जिल्हा संक्रमण अधिकारी