(नाशिक / प्रतिनिधी)
नव्या पिढीवर सुसंस्कार व्हावेत आणि त्याचबरोबर उपवर मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्नही सुटावा यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सेवामार्गातर्फे गावागावात बालसंस्कार केंद्र आणि विवाह मंडळे उभारा अशी स्पष्ट सूचना अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केली तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून गुरुमाऊलींना प्रतिसाद दिला.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये (२१जून) मासिक महासत्संग अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीर आणि रक्तदान शिबीरही घेण्यात आले. सेवेकऱ्यांना संबोधित करताना गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की,इतर आध्यात्मिक सेवा कमी झाल्या तरी चालतील मात्र समाजाला आवश्यक असलेल्या मूल्य संस्काराची चळवळ अधिकाधिक गतिमान झाली पाहिजे. त्यासाठी यापुढे दैनिक स्वरूपाची सेवा केंद्रे उभारण्याचा प्रयत्न करू नका तर ग्राम अभियानाच्या माध्यमातून गर्भ शिशु आणि मूल्य संस्काराचे कार्य घराघरात पोहोचवा.नव्या पिढीवर सुसंस्कार झाले तर श्रावणबाळ आणि पुंडलिकासारखी आज्ञाधारी पिढी तयार होईल आणि हीच पिढी पुढे देश, धर्म आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असे मत त्यांनी मांडले. गुरुपीठ हे शक्तिशाली अष्टशक्तीपीठ असल्यामुळे यापुढे सर्व सामुदायिक सेवा मर्यादित संख्येत गुरुपीठातच होतील असे त्यांनी घोषित केले.
भागवत सप्ताहात सहभागी व्हा…
भगवान श्रीकृष्णाची पुण्यभूमी असलेल्या मथुरेमध्ये राष्ट्रहितासाठी २७ जून पासून भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू होत आहे. ज्यांना सात दिवस पारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी ४ जुलै रोजी सांगतेला होणाऱ्या महाविष्णु याग, सत्यनारायण आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन या विशेष सेवेत अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आपल्या हितगुजामध्ये त्यांनी वास्तुशास्त्र, आयुर्वेद, पर्यावरण, कायदा सुव्यवस्था, दुर्ग अभियान आदी विषयांवरही मार्गदर्शन केले. यावेळी गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.
शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड अभियान..
सेवामार्गाच्या कृषी व पर्यावरण विभागातर्फे शेतकऱ्यांच्या बांधा बांधावर जून ते ऑगस्ट दरम्यान वृक्ष लागवड अभियान राबविले जाणार आहे. बांधा- बांधावर झाडे लावल्यास पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, पाणी धारणा क्षमता वाढेल आणि शेतीचे संरक्षण होईल. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे अशी आज्ञा गुरुमाऊलीनी केली.