(रत्नागिरी)
प्लास्टिक पिशवीचे ५ रुपये स्कॅन करण्याच्या वादातून चार तरुणांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करताच, रुग्णालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांनी पोलिसांची एक तुकडी तैनात केली होती.
अर्जुन विवेक चव्हाण (१८) आणि त्याचे भाऊ विलास चव्हाण, किरण चव्हाण आणि करण चव्हाण (सर्व रा. मुरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) अशी चौघांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी अर्जुन चव्हाण मिरकरवाडा येथील जेटीवर मच्छी खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी मच्छी खरेदी केल्यानंतर त्याने बाजूलाच प्लास्टिक पिशवी विकणाऱ्या टेम्पोतील विक्रेत्याकडून एक पिशवी विकत घेतली. त्या पिशवीचे पैसे देण्यासाठी अर्जुन त्या विक्रेत्याकडील स्कॅनरचा वापर करत असताना, विक्रेत्याने तो स्कॅनर बंद असल्याचे सांगितले.
त्यानंतर, अर्जुनने आपल्याकडे रोख रक्कम नसल्याचे सांगितल्यावर, पिशवी विक्रेत्यामध्ये आणि अर्जुनमध्ये बाचाबाची झाली होऊन त्यांच्यात धक्काबुक्की झाली. या प्रकारानंतर अर्जुनने आपल्या भावांना घटनास्थळी बोलावून घेतल्यानंतर दोन्ही जमावात मारहाण झाली. मारहाणीनंतर दोन्ही गट जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकाराची दखल घेत शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर हे तातडीने सहकाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकरणी जसजशी तक्रार येईल तसतसे पुरवणी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे यावेळी पोलीस निरीक्षक शिवरकर यांनी या सर्वांना सांगितले.
मात्र, यामुळेच मंगळवारी उशिरापर्यंत रत्नागिरी पोलीस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी मिरकरवाडा येथील मकसुद सोलकर, सोहेल साखरकर, यासीन साखरकर, ताबीज साखरकर, रऊफ साखरकर, उबेद होडेकर अन्य दोन अशा आठजणांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३चे कलम ११८ (१), ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (२), ३५२, ३५१(२), ३७ (१), ३७ (३) आणि १३५ प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मिरकरवाडा येथील विक्रेत्याकडूनही पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.