( रत्नागिरी /प्रतिनिधी )
खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे विंचूदंश झालेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव सोहम मंगेश शिर्के असे असून, तो नुकताच दहावी उत्तीर्ण झाला होता. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेतील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
११ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोहमला विंचू चावल्याचे कळताच त्याच्या नातेवाइकांनी तातडीने त्याला तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. परिणामी त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिकच बिघडल्याने डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचारादरम्यान सोहमचा मृत्यू झाला.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत संबंधित डॉक्टरला नोटीसही बजावण्यात आली असून, याची माहिती खेड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी दिली.
सोहमच्या नातेवाइकांनी सुरुवातीला त्याला खेड येथील एका खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र नंतर कळंबणी आणि डेरवण येथे नेण्यात आले. या प्रवासात बराच वेळ गेल्यानेही उपचारास विलंब झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेची नोंद खेड पोलिस स्थानकात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. तसेच आरोग्य विभागाच्या स्तरावरही या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी आपत्कालीन स्थितीत सज्ज राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या जातात. मात्र तरीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा अनुपस्थितीचा प्रकार गंभीर चिंता निर्माण करणारा आहे.