(मुंबई)
मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही काळापासून कामाच्या अभावामुळे तो नैराश्यात होता, आणि अखेर त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तुषार मुंबईतील भांडुप परिसरात वास्तव्यास होता. त्याच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
तुषारने अनेक मराठी मालिकांमध्ये लहान पण लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला होता. याशिवाय ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ या चित्रपटांमध्ये आणि ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अलीकडेच ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेतही त्याचे काम झळकले होते.
तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा होता. त्याने मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात शिकत असताना अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. रुपारेलच्या नाट्यविभागातील एक लोकप्रिय चेहरा म्हणून तो ओळखला जात होता. मित्रमंडळीत ‘घाड्या’ या टोपणनावाने त्याला प्रेमाने हाक मारली जात असे.
तुषारच्या आत्महत्येमागील प्राथमिक कारण काम मिळत नसल्याचे आणि मानसिक तणाव असल्याचे सांगितले जात आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील अनिश्चितता, आर्थिक ताणतणाव आणि अपेक्षा-प्रत्यक्ष वास्तवातील दरी यामुळे त्याला नैराश्य आले होते, अशी माहिती समोर आली आहे.
तुषारच्या आकस्मिक मृत्यूनंतर कलाविश्वातून दुःख व्यक्त केले जात आहे. अभिनेता अंकुर वाढवे याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले – “मित्रा का? कशासाठी? काम येतात-जातात! आपण मार्ग शोधायला हवा. आत्महत्या हा पर्याय नाही. परिस्थिती अवघड असली तरी असा निर्णय योग्य नाही. तुषार, तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो…”
ज्येष्ठ अभिनेता वैभव मांगले यांनीही सामाजिक माध्यमातून व्यक्त होत म्हटले की, “माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात… आणि अशी माणसं शेवटी एकटी पडतात.”
इतक्या तरुण, प्रतिभाशाली अभिनेत्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने प्रेक्षक, मित्रमंडळी आणि सहकारी हळहळ व्यक्त करत आहेत. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत दुःखद असून, नैराश्याच्या काळोखात अडकलेल्या प्रत्येकाला योग्य वेळी मानसिक आधार, संवाद आणि मदतीची आवश्यकता असते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित होते.