(चिपळूण)
कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच प्राध्यापक ज्ञानोबा बोकडे व श्री संदीप काळे यांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. या कार्यक्रमात कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या प्रसंगी निरोगी आयुष्यासाठी आहाराइतकेच योगाचे महत्त्व अनमोल आहे, हे अधोरेखित करण्यात आले. भारताच्या प्राचीन संस्कृतीचा भाग असलेल्या ऋग्वेदातही योगाचे महत्त्व विशद केले आहे. योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून, ती मन आणि शरीर यांना एकत्र आणणारी एक प्राचीन कला आणि विज्ञान आहे. योगाचा उगम भारतात हजारो वर्षांपूर्वी झाला आणि तो आध्यात्मिक वाढ, आंतरिक शांती आणि शारीरिक आरोग्यासाठी एक मार्ग म्हणून विकसित झाला. २०१४ सालापासून दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो, ज्यामुळे जगभरात योगाचे फायदे आणि त्याचे महत्त्व पोहोचवले जात आहे.
योगाभ्यासामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात, योगामुळे स्नायू मजबूत होतात, लवचिकता वाढते, शरीराची मुद्रा सुधारते आणि सांधेदुखी कमी होते. नियमित योगाभ्यासामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, पचनसंस्था सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, योगातील ध्यान आणि श्वासोच्छ्वास तंत्रामुळे ताण कमी होतो, चिंता आणि नैराश्य दूर होते. मन शांत आणि एकाग्र होते, ज्यामुळे मानसिक स्पष्टता वाढते, योगामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समन्वय साधला जातो. यामुळे आंतरिक शांतता आणि समाधान मिळते. योगासने आणि प्राणायामामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते, नियमित योगाभ्यासामुळे निद्रानाश कमी होतो आणि शांत व गाढ झोप लागण्यास मदत होते.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे विविध योगासने करून या दिवसाचे महत्त्व जपले आणि योगाभ्यासाचे फायदे आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करण्याचा संकल्प केला. हा कार्यक्रम केवळ योग दिनापुरता मर्यादित न राहता, निरोगी आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व पटवून देणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.