(मुंबई)
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सावरण्यास हातभार लागला आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू केले असून, त्यांचे स्वप्न उभारणीच्या वाटेवर आहे. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना आणखी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे—मुंबई बँकेच्या माध्यमातून त्यांना शून्य टक्के व्याजदराने १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, “पूर्वी महिलांना ९ टक्के व्याजदराने कर्ज मिळत होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आता या कर्जावरचा व्याजदर शून्यावर आणण्यात आला आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.”
या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या चार प्रमुख महामंडळांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामध्ये:
- अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ
- भटक्या व विमुक्त जातींचे विकास महामंडळ
- इतर मागासवर्गीय (ओबीसी) महामंडळ
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ‘आई योजना’
या सर्व योजनांतून महिलांना १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे या योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजदरात कर्ज मिळू शकते, असे गणित दरेकर यांनी स्पष्ट केले.
कर्ज कसे आणि कोणाला मिळेल?
- एक महिला १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकते.
- ५ ते १० महिलांचा गट एकत्र येऊन संयुक्तरित्या उद्योग सुरू करू शकतो.
- कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेमार्फत संबंधित व्यवसायाची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.
- महामंडळाकडून व्याजाची रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया बँक हाती घेईल.
मुंबई बँकेच्या माहितीनुसार, सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेचे १२ ते १३ लाख लाभार्थी असून, त्यापैकी सुमारे १ लाख महिला बँकेच्या सदस्य आहेत. यामुळे मोठ्या संख्येने महिलांना शून्य टक्के व्याजदराच्या कर्जाचा थेट लाभ होणार आहे.
दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, “स्वयंपूर्ण विकासासाठी महिलांनी उद्योग-व्यवसायात पुढे यावं, हेच सरकारचं उद्दिष्ट आहे. महिलांचे उत्पन्नवाढीसाठी हे कर्ज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”