(मुंबई)
“महाराष्ट्रातून ठाकरे नावाचा ब्रँड तुम्ही संपू शकत नाही. मी छाताडावर बसून तुम्हाला गाडेन,” अशा ठाम शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजप, शिंदे गट आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
“आज जो जल्लोष दिसतोय, ते माझ्या ताकदीमुळे नाही, ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्त आटवून जो विचार रुजवला, त्याचं हे फळ आहे. या दृश्यावर विश्वास बसणार नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं सांगितलं. ज्यांना आत्ताच दाढी फुटली, तेव्हा ते कुठे होते, हेच माहीत नाही,” असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार टोला लगावला. समोर या, वार करा! मी जाहीर आव्हान देतो – तुमच्या छाताडावर बसून लढेन, अशी आक्रमक भाषा वापरत त्यांनी शिंदे गटाला थेट लढतीचं आव्हान दिलं.
भाजपावर शाब्दिक झणझणीत प्रहार
“भाजपाला स्वतःची पोरं होत नाहीत, म्हणून दुसऱ्याची पोरं आणि बाप चोरतात. आज देशाला पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. पण, मोदींनी आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनसारख्या संघटनांशी केली – लाज वाटायला पाहिजे! अमित शहा ‘घरफोडी मंत्री’ आहेत. फसवी वचने देऊन सत्तेवर आले, आणि आता देश फसवणुकीच्या सरकारच्या अधीन आहे,” असा जोरदार आरोप उद्धव ठाकरेंनी केला. “७० हजार कोटींचे घोटाळे करणाऱ्यांना भाजप देवासारखा स्वीकारतो. मुंबईत मराठी माणसात भांडण लावली जात आहेत. हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. भाजपाची भाषा, वृत्ती आणि भ्रष्ट कारभार — हे सगळं उद्ध्वस्त करायला हवं. भाजपाला जोड्याने हाणलं पाहिजे!” असा घणाघात करत त्यांनी भाजपमधील नेत्यांवर नाव न घेता टीका केली.
राज ठाकरेंबरोबर युतीचे संकेत
“सध्या राज ठाकरे आणि माझ्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. मी माझ्या माजी नगरसेवकांना विचारलं – काय वाटतं? त्यांनी दिलेली प्रतिक्रिया जनतेच्या मनाशी मिळती-जुळती आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकायला तयार आहोत. मुंबईला वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी आणि मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. आज हिंदू-मुस्लिम, हिंदी-मराठीच्या नावावर भांडण लावली जात आहेत. पण ही मुंबई तुम्ही गमावू देणार आहात का? असं प्रश्नही शिवसैनिकांना विचारत त्यांनी भावनिक साद घातली.
गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवाजी पार्क परिसरात हजारो शिवसैनिकांची उपस्थिती, भगवे झेंडे आणि घोषणांनी सभास्थळ दणाणून गेलं.