(मुंबई)
मराठी मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मालिका ‘चार दिवस सासूचे’, ‘मन बावरे’ आणि अनेक दर्जेदार चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे अकस्मात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. विवेक लागू हे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. त्यांच्या मागे लेखिका व अभिनेत्री मृण्मयी लागू वायकुळ ही कन्या आहे. आज २० जून रोजी, अंधेरीतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. शिवाय संगीतातही त्यांची रुची होती. मात्र अपघातानेच ते अभिनयाकडे वळले.
नाटक, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय… बहुआयामी प्रवास
१५ ऑक्टोबर १९५३ रोजी पुणे येथे जन्मलेले विवेक लागू यांचे शिक्षण सुरू असतानाच त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली. पुढे मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात सक्रिय काम सुरू केलं. प्रारंभी त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनावर भर दिला, मात्र कालांतराने ते अभिनयाकडे वळले आणि या क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
रीमा लागू यांच्याशी नातं आणि आयुष्यातील वळणं
विवेक लागू आणि रीमा लागू यांची ओळख बँकांमधील नाट्यस्पर्धांमध्ये झाली. त्यावेळी विवेक लागू बँकेत नोकरी करत होते, आणि नाट्यस्पर्धांमधून रंगभूमीशी जोडले गेले होते. त्या काळात नयना बडबडे नावाच्या रीमा यांच्याशी त्यांची ओळख झाली, जी पुढे १९७८ मध्ये विवाहात रूपांतरित झाली. मात्र, हा संसार फार काळ टिकला नाही आणि एक दशकानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तरीही, दोघांमधील मैत्रीचे नाते कायम राहिले. रीमा लागू यांचे २०१७ मध्ये निधन झाले. त्यानंतर ही जोडी कायमची पटलावरून उतरली.
गाजलेल्या भूमिका आणि अभियनयातील ठसा
विवेक लागू यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या.
त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये –
-
‘गोदावरीने काय केले’
-
‘व्हॉट अबाऊट सावरकर’
-
‘३१ दिवस’
-
‘अग्ली’
यांचा समावेश होतो. त्यांची ‘चार दिवस सासूचे’ ही मालिकाही प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यांच्या सहज, अभ्यासू आणि समर्पित अभिनयशैलीमुळे ते प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करू शकले. विवेक लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने एक संवेदनशील, समंजस आणि प्रतिभावान कलाकार हरपला आहे.