( मुंबई )
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत गळती सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसला असून, श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. सुर्वेंनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यांच्या बरोबर अनेक स्थानिक पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते आणि समाज संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.
प्रवेश सोहळ्याला मोठी उपस्थिती
या प्रवेश सोहळ्यास पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सुभाष केकाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील तटकरे यांची भावना
“प्रदीर्घ काळानंतर सुर्वे माझ्यासोबत आले, हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे,” असे सांगताना खासदार सुनील तटकरे यांनी १९९५ पासून श्रीवर्धन हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिल्याचे सांगितले. “तेव्हा राजकीय संघर्ष होता पण मनभेद नव्हते. सुर्वे यांची पक्षनिष्ठा कायम राहिल्यामुळेच मला त्या काळात मताधिक्य कमी मिळाले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या नेत्यांनी केला पक्षप्रवेश
-
सुजित तांदळेकर – रायगड संपर्कप्रमुख, शिवसेना (उबाठा)
-
बाबुराव चोरगे – सभापती, श्रीवर्धन पंचायत समिती
-
गीता चोरगे – सरपंच, कारीवणे गाव
-
तसेच मराठा आणि कुणबी समाज संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक स्थानिक कार्यकर्ते
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळतोय का?
तुकाराम सुर्वे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे १६वे माजी आमदार ठरले आहेत. कोकणातील श्रीवर्धन हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जात असतानाही येथील नेत्यांची अशी गळती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान ठरू शकते. या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोकणातील समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिंदे आणि ठाकरे गटामधील अंतर्गत स्पर्धेत अजित पवार गटाने एक पाऊल पुढे टाकल्याचे हे उदाहरण मानले जात आहे.