(नवी दिल्ली)
भारतीय रेल्वे मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने महत्त्वाची पावले उचलत आहे. आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार, लांब पल्ल्याच्या ज्या ट्रेन दुपारी २ वाजण्याआधी सुटतात, त्या ट्रेनमधील प्रवाशांच्या सोईसाठी रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन सुटण्याच्या आदल्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत तयार केला जाईल.
सद्यस्थितीत, ट्रेन सुटण्याच्या केवळ ४ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट तयार होत असल्याने आपले तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही या चिंतेत प्रवासी असतात. प्रवाशांची ही चिंता दूर करण्यासाठीच रेल्वे मंडळाने रिझर्व्हेशन चार्टचा प्रस्ताव सादर केला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच प्रवासी आरक्षण प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचा आढावा घेतला. ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’ मार्फत हा प्रकल्प कार्यान्वित केला जात आहे. नवीन प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक मिनिटाला दीड लाखांहून अधिक तिकीट आरक्षण करणे शक्य होईल. सध्याच्या घडीला प्रति मिनिट ३२ हजार तिकीटांचे आरक्षण होते. जुन्या क्षमतेपेक्षा नवी क्षमता जवळपास पाचपटीने अधिक आहे.