(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय बनलेल्या “थिबा राजा कालीन बुद्ध विहार”च्या रक्षणासाठी आता संघर्ष अधिक संघटित आणि जोरदार होणार आहे. दिनांक 14 जून रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (जिल्हा शासकीय रुग्णालय जवळ) येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत “थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती”ची अधिकृत स्थापना करण्यात आली.
या विहारासाठी राखीव असलेल्या जागेवर कम्युनिटी सेंटर उभारण्याचा प्रयत्न ट्रस्टतर्फे करण्यात आला होता. मात्र, समाजाच्या तीव्र विरोधामुळे आणि न्यायालयीन हस्तक्षेपामुळे त्या कामाला स्थगिती मिळाली. भिम युवा पँथरच्या पुढाकाराने स्थानिक न्यायालयात कामाला तात्पुरती स्थगिती मिळवण्यात आली असून, सामाजिक कार्यकर्ते रत्नदिप कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयातून “जैसे थे”ची ऑर्डर मिळवली आहे.
या लढ्याला एकत्रित दिशा नसल्याने पुढील पावले ठामपणे उचलणे गरजेचे होते. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस 52 गावशाखांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. या बैठकीचे अध्यक्षपद भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. एल व्ही पवार यांच्याकडे होते, तर प्रस्तावना भिम युवा पँथरचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी सादर केली. बैठकीत विविध मान्यवरांनी आपले विचार मांडून संघर्षाला पाठिंबा दर्शविला. नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष एल व्ही पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, कोषाध्यक्ष नरेंद्र आयरे, उपाध्यक्ष अनिल (भाई) जाधव, प्रकाश पवार, किशोर पवार, सहसचिव तुषार जाधव, सुवेश कांबळे, रूपेश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख केतन पवार, सल्लागार दीपक जाधव, संजय आयरे, सुनील आंबुलकर समावेश आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य आशुतोष कांबळे (शहर विभाग), शिवराम कदम (हरचेरी विभाग), राजेंद्र कांबळे (कोतवडे विभाग), सुरेश जाधव (जाकादेवी विभाग), सुहांग पवार (खंडाळा विभाग), मुकुंद सावंत (पाली विभाग), प्रकाश सावंत (हातखंबा विभाग), विजय पालकर (पावस विभाग), प्रदीप पवार (कुवारबाव विभाग), दिलीप सावंत (खेडशी विभाग), दिवेन कांबळे, राहुल पवार, बी.के. कांबळे व इतर 13 मान्यवर सदस्य निवड करून समितीची स्थापना झाल्यामुळे बुद्ध विहार रक्षणाच्या लढ्याला आता अधिक दिशा आणि बळ मिळणार आहे.
समाजात आश्वासकता आणि चैतन्य निर्माण झाले असून, उर्वरित गावांशी लवकरच संपर्क साधून त्यांनाही या लढ्यात सहभागी करून घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. लवकरच इच्छुक व कर्तबगार बांधवांना समितीत समाविष्ट करून मानाचे स्थान दिले जाणार असल्याचेही बैठकीत जाहीर करण्यात आले.