(रत्नागिरी)
गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यातील वाटद विभागातील सैतवडे गावात ढगफुटी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सोमवारी या पावसामुळे गावात अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
सैतवडे ग्रामपंचायत परिसरात बोरसई येथील मुश्ताक मुल्ला यांच्या घरासमोर दरड कोसळून झाड सरळ घरावरच कोसळले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील बाजूची दरडही कोसळल्याने पावसाचे पाणी थेट कार्यालयात शिरले. शफिया बोंद्रे यांच्या घराशेजारी भिंत कोसळून पाणी घरात घुसले.
बनवाडी येथे माजी सरपंच सागर कदम यांच्या घराशेजारी दरड कोसळून वहाळात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शाळकरी मुलांना ये-जा करणे अशक्य झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशीच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. चिंचबंदर येथे रमेश नाटेकर यांच्या घरामागील दरड कोसळून घराचे नुकसान झाले आहे.
या आपत्तीमुळे गावात चिंतेचे वातावरण असताना, सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुभाष मोहीते व सागर कदम यांच्यासह मदतकार्य सुरू केले. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तुटलेल्या विजेच्या तारा व वाकलेले विद्युत खांब यांची माहिती दिली. तलाठ्यांनाही तत्काळ माहिती देऊन कोतवालांसह प्रशासन घटनास्थळी आणण्यात आले.
सरपंच साजिद शेकासन यांच्या या तत्परतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ढगफुटीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. गावात अजूनही पावसाचे प्रमाण कायम असून, परिस्थितीवर ग्रामपंचायतीचे बारकाईने लक्ष आहे.