(संगमेश्वर / प्रतिनिधी)
रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली असून, शास्त्री नदीच्या पाणीपातळीत झालेल्या झपाट्याने वाढीमुळे संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ बाजारपेठ पूर्णतः जलमय झाली आहे.
रामपेठ येथील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ पाण्याखाली गेले असून, व्यापार ठप्प झाला आहे. अनेक दुकाने आणि घरे पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि ग्राहकांना कमरभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून, पोलीस पाटील श्री. कोळवणकर यांनी सांगितले, “शास्त्री नदीची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आपले मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.”
रत्नागिरीच्या अन्य भागांतही पावसाचा जोर कायम असून, अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत.
व्हिडिओ : मकरंद सुर्वे, संगमेश्वर