( रत्नागिरी )
नवीन शैक्षणिक वर्षाचा आज पहिला दिवस, सर्वत्र नव्या उमेदीनं आणि उत्साहात स्वागत केलं जात आहे. पालक, ग्रामस्थ आपल्या बालकांना नव्या इयत्तेत भरती करत आहेत. काही ठिकाणी नवागत विद्यार्थ्यांचं औपचारिक स्वागतही करण्यात आलं. मात्र, या आनंदावर विरजण घालणारी गोष्ट म्हणजे अनेक शाळांमध्ये आवश्यक शिक्षकच अनुपस्थित आहेत.
शाळेच्या पहिल्याच दिवशी रोस्टरप्रमाणे शिक्षक उपस्थित नसल्याचं लक्षात आलं आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत पालकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने प्रथम ते चौथीसाठी किमान दोन शिक्षक तर सातवीपर्यंतच्या शाळेसाठी चार शिक्षक उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये फक्त एक किंवा दोन शिक्षकच कार्यरत आहेत.
या परिस्थितीत शाळा दररोज उघडल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांना अपेक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळेल, याची खात्री पालकांना वाटत नाही. शिक्षकांची कमतरता आणि त्यांच्या वर असलेली प्रशासकीय कामांची भर यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण मोठ्या प्रमाणात अडथळ्यांत सापडतंय.
यावर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होत असली तरी पुरेशा शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास हे धोरणही प्रभावी ठरणार नाही, अशी स्पष्ट भावना पालकांमध्ये आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेल्या कायद्याचाही अर्थ उरलेला नाही, जर त्या शिक्षणासाठी मूलभूत घटक – शिक्षकच उपलब्ध नसतील.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या 1000 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. वारंवार होणाऱ्या जिल्हाबदल्या, निवृत्ती आणि नवीन भरतीचा अभाव यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या केवळ रत्नागिरीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण कोकण विभागात अशाच प्रकारची गंभीर अवस्था आहे.
स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांमुळे शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असूनही त्या शाळा फक्त औपचारिकपणे उघडल्या जात आहेत. शिक्षकांवर शाळेबाह्य कामांचा भार वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे अशक्य बनले आहे.
याशिवाय, मागील दोन वर्षांत शासनाने कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती केली होती – पहिल्या वर्षी 672 तर दुसऱ्या वर्षी 495 शिक्षकांची भरती झाली. मात्र, या सर्व स्थानिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्यानं ते आता शाळांमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत. याचा परिणामही थेट विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर, रिक्त शिक्षक पदांचा तातडीने भरणा करून प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. अन्यथा, ही नाराजी लवकरच व्यापक आंदोलनात परिवर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.