(मुंबई)
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेलं बंड हे पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड ठरलं. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनाच ताब्यात घेतली आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, याची खंत शिंदे गटाने वारंवार व्यक्त केली होती. आता याच बंडामागे ‘मातोश्री’तील रश्मी ठाकरे यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप होता, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला आहे.
गोगावले म्हणाले, “आम्ही शिवसेनेतून बाहेर पडण्यामागे अनेक कारणं होती. त्यापैकी एक कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर असलेला प्रचंड विश्वास आणि अति अवलंबित्व. पक्षातील अनेक जणांना संधी न देता आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं, तर मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना देणं अधिक योग्य ठरलं असतं.” गोगावले यांनी थेट रश्मी ठाकरे यांचं नाव न घेताही त्यांच्या हस्तक्षेपावर बोट ठेवत गंभीर आरोप केले. “पक्षातील आमदार आणि कार्यकर्ते मातोश्रीवर गेले की त्यांना तासनतास बसवून ठेवलं जात असे, उद्धव ठाकरे भेटत नसत. आमदाराचं काम न झालं तर कार्यकर्त्यांचं कोण ऐकणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘बाळासाहेबांचं नेतृत्व वेगळं होतं’
गोगावले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचं उदाहरण देत सांगितलं, “माझ्या वाढदिवशी मी बाळासाहेबांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला खुर्चीवर बसवले आणि स्पष्ट सांगितलं, ‘ही खुर्ची मी दिली आहे, आणि गरज पडली तर काढून घेणाराही मीच आहे.’ त्या वेळचा तो सुसंवाद आणि नेतृत्वशैली उद्धव ठाकरेंमध्ये दिसली नाही. महिलांचा हस्तक्षेप कुठपर्यंत असावा याचा विचार झाला पाहिजे. पडद्यामागून होणारा रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप अनेक निर्णयांवर प्रभाव टाकत होता. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयांमध्ये सातत्य नव्हतं, त्यांची मतं बदलत असत.” गोगावले यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितलं की, “एकेकाळी दोन्ही ठाकरे – उद्धव आणि राज – पुन्हा एकत्र येण्याची शक्यता होती. पण ती संधी उद्धव ठाकरेंनी गमावली. पक्षासाठी आणि शिवसेनेच्या भविष्यासाठी तो एक मोठा टप्पा ठरू शकला असता.” गोगावले यांनी ठामपणे सांगितलं, “आम्ही आजही बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा जपतोय. म्हणूनच पक्षाचं नाव आणि चिन्ह आम्हाला मिळालं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पुढे नेत आहोत.”
शिवसेनेवर आरोप करणे निंदनीय — आनंद परांजपेंचे प्रत्युत्तर
रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी हपापलेले भरत गोगावले राजकीय अपरिपक्व असून, त्यांच्यात संवेदनशीलतेचा अभाव आहे, अशी तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या कुटुंबातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी केलेले आरोप निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोगावले यांनी सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यावर परांजपेंनी प्रत्युत्तर देताना, “तुमच्याकडे काही पुरावे असतील, तर ते पुढे आणा. अन्यथा आम्ही तुमचे आर्थिक व गुन्हेगारी घोटाळे सात दिवसांत उघड करू,” असा इशारा दिला.
‘थ्री इडियट्स’वर टीका
परांजपे यांनी गोगावले यांना नाव न घेता ‘थ्री इडियट्स’मधला एक ‘इडियट’ म्हणून संबोधले आणि “तटकरे यांच्यावर टीका हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम आहे,” अशी टीका केली. “2019 मध्ये तटकरे युतीच्या धर्माचे पालन करत निवडून आले. अन्यथा गोगावले यांच्यासह अजून दोन उमेदवार पडले असते,” असा टोलाही त्यांनी लगावला. “ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली, त्याच पक्षावर आणि रश्मी ठाकरेंवर आरोप करणे अत्यंत खेदजनक आहे. मीही शिवसेनेत काम केले आहे; रश्मी वहिनी कधीही पक्षात हस्तक्षेप करत नव्हत्या,” असे म्हणत परांजपेंनी गोगावले यांना खडेबोल सुनावले.
गोगावले यांचं प्रत्युत्तर
गोगावले यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत “जर भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर मी मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा देईन. पण आरोप सिद्ध न केल्यास आनंद परांजपे तोंड काळं करून घेतील का?” असे प्रतिआव्हान दिले. गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना उधाण येण्याची शक्यता आहे.