(रत्नागिरी)
जिल्ह्यात गोवंश वाहतूक व कत्तल प्रतिबंधासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून, देवरूख पोलिसांनी अलीकडेच केलेल्या कारवाईत अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करत तब्बल 3.73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने देवरूख पोलीस ठाण्याने 13 जून रोजी रात्री 8.35 वाजता साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील मूर्ती चेकपोस्ट येथे कारवाई केली.
गस्ती दरम्यान संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-08-M-4929) वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात दोन बैल हालचाल करता न येईल अशा अवस्थेत बांधलेले आढळून आले. वाहन चालक सागर नामदेव पाटील (रा. पिशवी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) व त्याच्यासोबतचे प्रदीप अरुण लाटवडेकर आणि बैलांचे मालक नागेश कदम हे कत्तलीसाठी गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, मोटार वाहन कायदा तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एक बोलेरो पिकअप (₹3,50,000), दोन बैल (₹13,000 व ₹10,000) असा एकूण ₹3,73,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन्ही बैलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी सागर पाटील यास नोटीस बजावण्यात आली असून, उर्वरित दोघांवरही कायदेशीर कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे बैलांचे मालक नागेश कदम याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व लांजा उपविभागीय अधिकारी श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्री. महेश तोरसकर व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत पो.उ.नि. नामदेव जाधव, पो. हवा. नितीन जाधव, पो. हवा. संजय करांडे, पो. कॉ. सुहास लाड, पो. कॉ. तानाजी पाटील, पो. कॉ. तुळसणकर (पोलीस मुख्यालय, रत्नागिरी) आदी सहभागी होते.