(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहराला लोवले येथील जॅकवेल मधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेले दोन दिवस काही भागात कमी दाबाचा पाणी पुरवठा होत आहे. तर काही भागात दोन दिवस नळाला एक थेंब सुद्धा पाणी आला नसल्याची सुद्धा बोंबाबोंब सुरु आहे. ऐन शिमगोत्सवात पाणी नसल्याने संगमेश्वरवासियांचे अतोनात हाल झाले आहे. पंप नादुरुस्त असल्याचे कारण ग्रामपंचायत प्रशासन पुढे करून याबाबत नेहमी प्रमाणे उत्तरे देऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असल्याने संगमेश्वरवासियांतून शिमगोत्सवात ग्रामपंचायत प्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब केली जात आहे.
कुठलीही प्रशासन व्यवस्था ही नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजेपासून वंचित ठेऊ शकत नाही व त्यात पाणी हे जीवनावश्यक गोष्ट असल्याने त्याची व्यवस्था करून देणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे आद्य कर्तव्य असताना गेले दोन दिवस संपूर्ण शहराला पाणी आलेले नाही, अशी ओरड सुरु आहे. शिमगोत्सव कालावधी असल्याने या सणाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी तसेच पाहुणे मंडळी आलेले असताना पाण्याचा पत्ता नसल्याने खूप हाल झाले असून पाणी नसल्याने काही चाकरमान्यांनी व आलेल्या पाहुण्यांनी पुन्हा परतीचा मार्ग पत्करला, तर काहीनी लॉज मध्ये राहण्याची व्यवस्था केल्याचे समजते.
याच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या संभाजीनगर येथील लोकांचे सुद्धा पाण्याविना अतोनात हाल झाले आहेत. या वस्तीत सुद्धा दोन दिवस पाणी आले नसल्याचे येथील लोकांचे म्हणणे असून येथील वस्तीला पाण्याचे अन्य कोणतेही स्रोत नसल्याने ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते . त्यामुळे सकाळच्या वेळात व रखरखत्या उन्हात पाण्याविना त्यांचे काय हाल होत असतील याचा विचारच करायला नको.
पंप नादुरुत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे उत्तर हास्यास्पद
दोन दिवस पाणी नसल्या संदर्भात पंप नादुरुस्त असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे उत्तर समोर आले आहे. मात्र तीन पंप ग्रामपंचायत मालकीचे असून एक जॅकवेलला कार्यान्वित असून पर्यायी अतिरिक्त दोन असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळणारी उत्तरे ही हास्यास्पद आणि संताप व्यक्त करणारी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.